पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे दिमाखदार उद्घाटन; उपमहापौर शर्मीलाताई बाबर यांच्या हस्ते ऐतिहासिक पाऊल
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि 'नारी द वुमन' संस्थेचा पुढाकार; रोजगार, शिक्षण आणि सामाजिक प्रवाहात आणण्यावर विशेष भर



पिंपरी, २९ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील पहिल्या **’तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे’** उद्घाटन नुकतेच पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात उपमहापौर शर्मीलाताई बाबर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यात तृतीयपंथीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक स्वीकार मिळवून देण्याच्या मुद्द्यावर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.
‘नारी द वुमन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख व उपाध्यक्षा अर्चना मेंगडे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.
या कार्यक्रमास उपमहापौर शर्मीलाताई बाबर यांच्यासह विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, सामाजिक समरसता गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक विलास लांडगे, प्रांत मंडळाचे सदस्य ॲड. मुकुंद यदमळ, डॉ. आम्रपाली मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने तृतीयपंथीय समाजबांधव उपस्थित होते.
तृतीयपंथी असणे हा शाप नसून निसर्गाचा स्वीकार” – उपमहापौर शर्मीलाताई बाबर
उद्घाटनानंतर बोलताना उपमहापौर शर्मीलाताई बाबर म्हणाल्या, “समाजाने तृतीयपंथीयांकडे दयेच्या नव्हे तर समानतेच्या आणि सन्मानाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत. तृतीयपंथीय असणे हा कोणताही शाप नसून निसर्गाचा स्वीकार आहे. रोजगाराच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेले हे समुपदेशन केंद्र राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.”
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर: “समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून त्यांना शिक्षण व रोजगार मिळवून दिल्यास देशासाठी हा एक आदर्श पॅटर्न ठरेल.
हा राज्यातील पहिला आणि अत्यंत स्तुत्य प्रयोग आहे. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या काळात सुरू झालेल्या या प्रवासातून आज तृतीयपंथीय महापालिकेत विविध पदांवर काम करत आहेत. त्यांच्यासाठी भविष्यात आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा विचार आहे.”
“केवळ कायदे करून चालत नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. हे समुपदेशन केंद्र त्यांना समाजात सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देईल.”
माजी अधिकारी सुहास बहादरपुरे “महानगरपालिकेतर्फे पहिल्यांदा जबानी कागदपत्रे, आधार कार्ड, बँक खाते बनवून तृतीयपंथीयांना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली. पहिल्यांदा वर्दी अंगावर चढवताना त्यांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू अविस्मरणीय होते.””आम्ही भारताचे नागरिक असून आम्हाला संविधानाने समान अधिकार दिले आहेत. शिक्षणाच्या बळावर आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहत आहोत, मात्र समाजातील दुटप्पी मानसिकता बदलली पाहिजे,” असा भावनिक सूर त्यांनी लावला.
समुपदेशन केंद्राचे प्रमुख उद्देश या केंद्राच्या माध्यमातून तृतीयपंथीय समाजाला खालीलप्रमाणे विविध सेवा आणि मार्गदर्शन मिळणार आहे:
* मानसिक व सामाजिक समुपदेशन
* रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन
* विविध शासकीय योजनांची (उदा. SMILE योजना, गरिमा गृह योजना, ट्रान्सजेंडर कायदा) माहिती व लाभ मिळवून देणे
* आधार कार्ड, बँक खाते यांसारख्या कागदपत्रे निर्मितीसाठी मदत
*शिक्षण व स्वावलंबनासाठी आवश्यक
या कार्यक्रमास माधुरी वैरागे, उपेन्द्र धाकपाडे, अवनी, अक्षय, मनस्वी, संघप्पा आदींसह बहुसंख्य तृतीयपंथीय उपस्थित होते. या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवड शहराने सामाजिक समतेचा एक नवा पायंडा पाडला.




