राज्यातील मागासवर्गीय समाजावरील अत्याचारांच्या घटनांवरून विधिमंडळात खळबळ; आमदार अमित गोरखे आक्रमक
दोषींवर कठोर कारवाई आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी


मुंबई :- १० जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):
राज्यातील मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांनी विधिमंडळात गंभीर पडसाद उमटले आहेत. जळगाव, बीड, सोलापूर आणि माळशिरस यांसारख्या विविध भागांत घडलेल्या अमानुष घटनांकडे लक्ष वेधत, भाजप आमदार अमित गोरखे यांनी याप्रकरणी सरकारला जाब विचारला आहे. सभागृहात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे त्यांनी गृहविभागाला यावर तात्काळ निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीनुसार, राज्यातील मागासवर्गीय समाजातील नागरिकांवर होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. त्यांनी मांडलेली प्रमुख प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत: जळगाव:प्रेमविवाहाच्या कारणावरून एका मागासवर्गीय युवकाला नग्न करून लोखंडी रॉडने अमानुष मारहाण. बीड :- मे २०२६ मध्ये उमेश दळवी या युवकाची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या,सोलापूर (चौंडेश्वरवाडी)शेतात काम करत असताना उषा विजय साठे या शेतकरी महिलेची सचिन देशमुख नावाच्या व्यक्तीकडून गोळी झाडून हत्या,इंदापूर एका १६ वर्षीय मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार.
बीड येथील प्रकरणाचा उल्लेख करताना आमदार गोरखे यांनी पोलीस प्रशासनातील निष्काळजीपणावरही कडक टीका केली. या प्रकरणाच्या तपासात पीआय शितलकुमार बल्लाळ यांनी गंभीर दप्तर दिरंगाई केल्याचा आरोप त्यांनी केला. अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“या केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या नसून, मागासवर्गीय समाजाविरुद्ध वाढत चाललेल्या जातीय मानसिकतेचे हे लक्षण आहे,” असे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले. त्यांनी मांडलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
सर्व प्रकरणांतील दोषींवर ‘अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत’ (Atrocity Act) तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत देऊन त्यांना न्याय मिळावा.कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि समाजात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी गृहविभागाने या संवेदनशील विषयावर सभागृहात सविस्तर निवेदन करावे.
या घटनांमुळे राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले.




