कामगारविरोधी सरकार खाली खेचा – संजोग वाघेरे
वाघेरे यांचा टाटा मोटर्स कामगारांशी संवाद !



पिंपरी :- महाराष्ट्रातील लहान, मोठे उद्योगधंदे स्थलांतरीत होत आहेत. विविध कंपन्या बंद पडत आहेत. तरुणांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. कामगारविरोधी कायदे करणाऱ्या सरकारला खाली खेचण्यासाठी आणि कामगारांच्या हितासाठी महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.
टाटा मोटर्स कामगारांशी वाघेरे यांनी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, प्रचार प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, राम दातीर पाटील, अमोल भोईटे यांच्यासह घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.
वाघेरे पाटील म्हणाले, बेरोजगारीच्या विळख्यात आजचा सुशिक्षित तरुणवर्ग सापडला आहे. अशिक्षित, अकुशल कामगारांचे हाल होत आहेत. सरकारने तळेगाव एमआयडीसी, आयटी पार्कमधील किती कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. किती कंपन्या बंद पडल्या आहेत, याचाही खुलासा करावा. आजचा तरुण हुशार आहे, कोण खरं बोलतो आणि कोण थापा मारतो आणि कोण फसवी गॅरंटी देतो. हे त्यांना बरोबर कळते. युवावर्गाची नोकऱ्यांसंदर्भातली होणारी क्रूर थट्टा थांबवावी लागेल. यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन वाघेरे यांनी कामगारांना केले.
यावेळी एकनाथ पवार, मारुती भापकर यांनी देखील उपस्थित कामगारांना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविषयी अवगत गेले. ही लोकसभा निवडणूक शेतकरी व कामगारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी संजोग वाघेरे यांना निवडून देऊन कामगारांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.




